बहुजननामा ऑनलाइन टीम – काही वर्षापूर्वी पोलिसांनी टाकलेल्या छापेमारीत बिहार न्यायालयातील तीन न्यायाधीस नेपाळमधील एका हॉटेलमध्ये महिलांसोबत अश्लिल चाळे (catastrophic situation )करताना रंगेहात पकडले गेले होते. या तिन्ही अधिकाऱ्यांना बिहार सरकारने सेवेतून बडतर्फ केले आहे. बिहारच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही या तिन्ही न्यायाधीशांचे अपील फेटाळून लावले आहेत.
हरी निवास गुप्ता, जितेंद्र नाथ सिंह आणि कोमल राम अशी बडतर्फ केलेल्या न्यायाधीशांची नावे आहेत. याप्रकरणातील हरि निवास गुप्ता त्यावेळी समस्तीपुरात कुटुंब न्यायालयात मुख्य न्यायाधीश होते. जितेंद्र नाथ सिंह हे अररिया जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश होते, कोमल राम हे अतिरिक्त न्यायाधीश आणि चीफ ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट होते.
राज्य सरकारच्या निर्णयात, पाटणा उच्च न्यायालयाच्या एका पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यानुसार, 12 फ्रेबुवारी 2014 पासून न्यायपालिकेतील या तिन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, सेवानिवृत्तीनंतरच्या कुठल्याही सुविधेचा लाभ या अधिकाऱ्यांना मिळणार नसल्याचे नमूद केले आहे.
दोषी आढळल्याने बडतर्फ
नेपाळ पोलिसांच्या हद्दीतील विराटनगर येथील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकला होता, त्यावेळी या तिन्ही अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांची सुटका झाली. नेपाळच्या एका वर्तमानपत्रात यासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाली होती, त्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. त्यानंतर, पटणा उच्च न्यायालयात या तिन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरु झाली होती. त्यात ते दोषी आढळल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.