मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता कोरोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. राज्यात मागील 24 तासांत 231 नवे कोरोना बाधित पोलीस आढळून आले आहेत. तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 7 हजार 950 पोलिसांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. राज्यात सोमवारपर्यंत 450196 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्वजण आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता त्यांना देखील कोरोनाची लागण होत असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळून येत आहे.
दरम्यान, राज्यात मागील 24 तासामध्ये 8968 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 50 हजार 196 इतकी झाली आहे. सध्या राज्यामध्ये 1 लाख 47 हजार 018 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात 10221 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 2 लाख 87 हजार 030 रुग्ण बरे होऊन दावाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत.