मुंबई बहुजननामा ऑनलाईन – धनगर समाज एकीकडे आंदोलनाच्या पावित्र्यात असताना राज्य सरकाने एक मोठा निर्णय घेतला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या २२ योजना लागू करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय़ महत्वपुर्ण समजला जात आहे.
राज्यातील धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना लागू करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे घोषीत करण्यात आले होते. या एक हजार कोटी रुपयांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला लागू असणाऱ्या योजना धनगर समाजासाठी लागू केल्या असल्याचे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
धनगर समाजासाठी आदिवासी समाजासाठी असणाऱ्या योजना ऑगस्टपासून लागू केल्या जाणार आहेत. अशी घोषणा महादेव जानकर यांनी केली होती. त्यामुळे योजनांचा प्रारूप आराखडा लवकरात लवकर तयार करा, असे निर्देश संबंधित विभागांना मंत्री महादेव जानकर यानी दिले होते. राज्यात धनगर समाजाने आता नाही तर कधीच नाही. अशी भूमिका घेत आरक्षणाच्या व इतर प्रश्नांवर रणशिंग फुंकले आहे. धनगर समाजाने २०१४ सालीही अशाच प्रकारे आंदोलन केले होते. त्यानंतर पाच वर्षांत सरकारने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोपही सत्ताधारी पक्षांवर करण्यात येत आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक आहे. तर पंढरपूरमध्ये धनगर समाजाचा महामेळावा पार पडणार आहे.