नवी दिल्ली वृत्तसंस्था – रेल्वे विभागाने विविध श्रेणीतील २.९४ लाख पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे, लोकसभेत बोलताना १० जुलै रोजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली. रेल्वेच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी सांगितले.
रेल्वेतील कर्मचाऱ्यांच्या १ जून १९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार रेल्वेमधील अ, ब, क आणि पूर्वाश्रमीच्या ड श्रेणीत २ लाख ९८ हजार ५७४ पदे रिक्त आहेत. रिक्त जागा भरणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गेल्या दहा वर्षांत रेल्वेत ४.६१ लाख लोकांची भरती करण्यात आली. १९९१ मध्ये रेल्वेकडे १६,५४,९८५ कर्मचारी होते. २०१९ मध्ये १२,४८,१०१ कर्मचारी आहेत. कर्मचारी संख्या कमी झाली असली, तरी रेल्वेच्या सेवेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
नाही होणार खासगीकरण !
रेल्वेच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती पीयूष गोयल यांनी लोकसभेला दिली.रेल्वेने दोन गाड्या खासगी संस्थांना चालवायला दिल्याच्या वृत्ताच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गोयल म्हणाले की, ‘खासगी संस्थांना चालवायला देण्यासाठी अजून कोणतीही गाडी निश्चित करण्यात आलेली नाही.