मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठ महिने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राचे सुमारे १९० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान हॉटेल क्षेत्र पूर्वीप्रमाणे उभे राहण्यास कमीतकमी दीड वर्षाचा तर रेस्टॉरंट क्षेत्रास सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
लॉकडाउनचा परिणाम अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. या काळात ३० ते ते ४० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद झाली आहेत. ४० ते ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या क्षेत्रात स्थानिक कामगार संख्या कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार काम करतात. ही संख्या सुमारे ७० टक्के आहे. लॉकडाऊन शिथिल होत असले तरी अद्याप स्थलांतरित कामगार परत आलेले नाहीत. कारण रेल्वे अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास बराच अवधी लागेल, असे मत हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने व्यक्त केले.
दरम्यान, मालमत्ता करात १ वर्षाची सवलत द्यावी, मार्च ते सप्टेंबर २०२० पर्यंत हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी व्याज माफ करावे, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय
हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवावे लागले हे खरे, मात्र महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा समूळ नाश करण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहे असे हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे प्रवक्ते गुरुबक्ष सिंग कोहली यांनी म्हंटले आहे.