बहुजननामा ऑनलाईन – खरेतर प्रजननाचा महत्वाचा स्त्रोत म्हणजे गर्भाशय. एक नवा जीव त्या गर्भाशयातच वाढच असतो. याच गर्भाशयावर महिलांचे आरोग्य अवलंबून असते. मात्र बीडमध्ये तब्बल १३ हजार उसतोड महिलांचे गर्भाशय शस्त्रक्रिया करुन काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून उघडकीस आली आहे. या संबंधीचा अहवाल बीड आरोग्य विभागाने चौकशी समितीकडे पाठविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्वेक्षणात बीडमधील ८२ हजार ९०० ऊसतोड महिलांची माहिती संकलित करण्यात आली. या सर्वेक्षणातील सर्व महिलांची संपूर्ण माहिती ऑनलाइन भरण्यात आली आहे. यात काही खासगी रुग्णालयांनी ऊसतोडणीला जाणाऱ्या अनेक महिलांना विविध आजारांची भीती दाखवत विनाकारण शस्त्रक्रिया केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्यसरकारने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने बीडमधील महिलांशी संवाद साधला. तसेच तेथील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून अडचणी आणि उपाययोजना जाणून घेतल्या.
या समितीने जिल्ह्यातील ऊसतोडणीला जाणाऱ्या महिलांची माहिती घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आला. त्यानंतर आशा सेविकांनी घरोघरी जाऊन ऊसतोडणी महिलांची माहिती घेतली. यात कधी व कोठे गर्भाशय काढले, रुग्णालयातून गर्भाशय काढण्याचे काय कारण सांगण्यात आले, आदी बाबींचा तपशील अहवालात आहे. हा अहवाल चौकशी समितीकडे पाठविण्यात आला असून अहवालाचा अभ्यास करून तो मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. यात एक धक्कादायक बाब म्हणजे सरकारी रुग्णालयाच्या तुलनेने खासगी रुग्णालयांमध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले आहे. त्यात बीड शहरातील सात, केजमधील १ एक आणि जिल्ह्यात इतर ठिकाणची दोन रुग्णालये असल्याची माहिती मिळाली आहे. या १० खासगी रुग्णालयांमध्येच जवळपास ६ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.