नाशिक : बहुजननामा ऑनलाईन- कामगारविरोधी धोरण राबवणाऱ्या मोदी सरकारला आगामी निवडणुकीत सत्तेतून खाली खेचण्यासाठी तसेच कामगार भरती करताना वापरण्यात येत असलेली कंत्राटी पद्धत, खाजगीकरणाचा निषेध करण्यासाठी देशभरातील कामगारांनी ८ व ९ जानेवारी २०१९ रोजी अखिल भारतीय संप पुकारला आहे.
इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार बरोबरच भांडवलदार वर्ग करत आहे. अनेक राज्यांत किमान वेतनामध्ये दहा ते पंधरा वर्षे वाढ केली जात नाही. राज्य सरकारचे अनेक महामंडळे किमान वेतन कायद्याची पायमल्ली करताना दिसतात. मोदी सरकारने कामगार क्षेत्रामध्ये नीम नावाची नवीन वर्गवारी तयार केली आहे.
कंत्राटी पद्धतीने भरती केलेले ‘शिकाऊ कामगार’ वर्षांनुवर्षे ‘शिकाऊ कामगारच’ राहणार आहेत. त्यामुळे भांडवलदारांना कमी वेतनात कुशल मनुष्यबळ मिळते; परंतु कामगारांना मात्र कोणतीही सेवासुविधा, हक्क, सुरक्षा नियमानुसार मिळत नाही. शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या श्रमावर देशाचा विकास होत असताना त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठीच हा देशव्यापी संप असणार असल्याचे इंटकच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या संपात इंटक, आयटक, सीटू यांसह सर्व खाजगी व शासकीय कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत. राज्यातील सर्व संघटित, असंघटित कामगार संघटनांनी या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष माजी आ. जयप्रकाश छाजेड यांसह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.