६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. दरम्यान लाखो अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. दरम्यान काहीच जण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित घटना, तसेच त्यांचा आठवणींना उजाळा देण्यात येतो. मात्र यावेळी उमरीतील ८४ वर्षीय शांताबाई नंदकुमार गवई यांनी आठवणींना एक उजाळा दिला आहे.
सन १९५३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माझ्या घरी जेवण केले होते. विशेष म्हणजे, सन १९५३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे डॉ. म. ना. वानखडे यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. त्यांच्यासोबत माईसाहेबही होत्या. त्यांच्या घरी त्यांनी जेवणही केले. बाबासाहेब यांना शांताबाई, त्यांच्या सासू मनोरमाबाई वानखडे यांनी जेवण वाढले. बाबासाहेबांनी बराच वेळ चर्चा केली. शांताबाई त्या वेळी २२ वर्षांच्या होत्या. त्यांचा मुलगा रत्नाकर वानखडे त्यावेळी दोन वर्षांचा असेल, रत्नाकरला बाबासाहेबांनी कडेवर घेऊन त्याचा लाडही केला होता. त्यांचे आमच्या घरी येणे म्हणजे आमच्या जगण्याला परिसाचा स्पर्श झाल्यासारखे होते. इतकेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैश्विक विचारांच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. मानवता जोपासत त्यांनी समतेचा संदेश दिला. शिका, संघटीत व्हा! संघर्ष करा! या त्यांच्या आवाहनाने नवी पिढी जागरुक झाली. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हा विचार अंगीकारत समाजानेही क्रांतीची बिजे रोवली. बाबासाहेब हयात असताना समाजबांधवांना फार मोठे पाठबळ होते. त्यांच्या महापरिनिर्वाणाने अखिल मानवमन गहीवरून आले. त्यांनी दिलेला विचार धम्मक्रांतीच्या माध्यमातून समाजात रुजल्याने ते आजही विचार रूपाने आमच्यात जिवंत असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
कोण आहेत शांताबाई नंदकुमार गवई ?
अकोल्यातील शेतकरी राजारामजी पळसपगार यांची कन्या शांताबाई पळसपगार. शिक्षणाची आवड खूप होती त्यामुळे शिक्षणासाठी त्यांनी आग्रह धरला. अकोल्यातील तत्कालीन गर्व्हमेंट हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. मात्र चौथीमध्ये शिकत असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. विशेष म्हणजे शांताबाईंचे वडिल सेवाभावी वृत्तीचे होते. ते अकोल्यात सुरू झालेल्या वसतिगृहास अन्नधान्य देत होते. त्यानंतर औरंगाबाद येथील शासकीय अधिकारी सुधाकर वानखडे यांच्यासोबत शांताबाई यांचा विवाह झाला. छावनीतील शासकीय निवासस्थानी राहायला होत्या.दरम्यान, पती सुधाकर वानखडे यांचे आजारामुळे निधन झाले. परिवाराला फार मोठा धक्का बसला. त्यानंतर शांताबाई माहेरी अकोल्यात आल्या. सन १९६३ मध्ये त्यांचा नंदकुमार गवई यांच्याशी दुसरा विवाह झाला. दरम्यानच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेत त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून सक्षम बनण्याच्या उद्देशाने त्या आरोग्य सेविका म्हणून बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाल्या. कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्या २७ सप्टेंबर ११९२ ला सेवानिवृत्त झाल्या.