नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – हलबा समाजाला संवैधानिक अधिकार देण्याच्या मागणीसह वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी हलबा क्रांती सेनेने सुरू केलेले उपोषण आठव्या दिवशी चिघळले. सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हलबा समाजातील संतप्त तरुणांनी लालगंज परिसरातील चकना चौक आणि परिसरात जाळपोळ करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. हलबा क्रांती सेनेतर्फे जगदिश खापेकर यांच्या नेतृत्वात युवा नेते कमलेश भगतकर यांनी १५ नोव्हेंबरपासून गांधीबागेतील रा. बा. कुंभारे यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले आहे. हलबा तरुणांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवीत आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांत ६ ते ७ बसेसची तोडफोड केल्यानंतर शासनाकडून प्रशासकीय प्रतिनिधी पाठविण्यात आले. परंतु, तोडगा निघू शकला नाही.
सातव्या दिवशी भगतकर यांना बळजबरीने उचलून नेण्यात आले, त्यांच्या जागेवर विजय मौंदेकर यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्याचवेळी तरुणांनी सरकारला धडा शिकविण्याची भाषा केली होती. ईदचा दिवस असल्याने त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण आठव्या दिवशी या तरुणांनी जाळपोळ सुरू केली. हलबाबहुल चकना चौक आणि मंगळवारीत टायर जाळून वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तरुणांनी घोषणा देत सरकारच्या धोरणांचा धिक्कार नोंदविला. आता दुर्लक्ष झाल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी तरुणांनी सरकारला दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आंदोलक तरुणांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अग्निशामक दलाच्या गाडीने तत्काळ पेटलेले टायर विझविले.