पुणे-बहुजननामा ऑनलाईन- आंबेडकर आणि संविधान हे एक समीकरण आहे. या समीकरणाशी एकनिष्ठ राहणे अतिशय आवश्यक आहे. अत्यंत ‘कडवा हिरवा’ अथवा ‘कडवा भगवा’ रंग देशाला परवडणारा नाही. तर सर्वांना सन्मानाने वागविणाऱ्या निळ्या रंगाचे प्रतिनिधित्व या देशाला आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील सर्व आंबेडकरवादी गटांना एकत्रित करण्याचे महत्वाचे काम भारतीय संविधान संवर्धन समितीच्या माध्यमातून घडते आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे मत माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधान संवर्धन समितीतर्फे भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान जागर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन बुधवारी आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अॅड. प्रमोद आडकर आणि अॅड. रंजना भोसले यांना अर्जुन डांगळे यांच्या हस्ते संविधान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, तिरंगी शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून माजी संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस बोलत होते. यावेळी नगरसेविका लता राजगुरू, नगरसेवक रवींद्र माळवदकर, सदानंद शेट्टी, संयोजक विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, सर्व जातीचे महासंघ हे संविधानविरोधी आहेत. आरक्षणाच्या संदर्भात त्याचे मूळ समजून घेतले पाहिजे. फुले-शाहू -आंबेडकर हे एक समीकरण आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांच्या विरोधात गेल्याने या विचार सरणीतील शाहू वेगळे आणि फुले वेगळे असे चित्र दुर्दैवाने निर्माण होत आहे. राज्यात केवळ राजकीय लोकशाही टिकून आहे. सामाजिक लोकशाही मात्र राजकारणाच़्या कचाट्यात अडकून सामाजाची अस्थैर्याकडे वाटचाल सुरू आहे. भ्रष्टाचारमुक्त, समान वागणूक देणारी व्यवस्था संविधान देत आहे. त्यामुळेच हे संविधान टिकविण्यासाठी सर्वांना एकजूट होऊन लढावे लागेल. त्यासाठीच हा संविधानाचा जागर झालाच पाहिजे.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक अविनाश महातेकर म्हणाले की, आंबेडकरी चळवळीचे कार्यक्रम आपण राबवत आहोत. यंदाच्यावर्षी सर्वसमाविष्ट कार्यक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येणार आहे. संविधान नष्ट होते की काय अशी भिती दर्शविली जात असताना,संविधानाचा सन्मान करण्यासाठी हा जागर कार्यक्रम कौतुकास्पद आहे. लोकांच्या मनात बाबसाहेबांचा सन्मान वाढावा, त्यांच्याबद्दल जवळीक निर्माण व्हावी, यासाठी आपण त्यांना योग्यप्रकारे सादर करणे आवश्यक आहे. बाबासाहेब हे केवळ एखाद्या समाजापुरतेच मर्यादित नव्हते, तर ते संपूर्ण भारताचे नेते होते. बाबासाहेबांनी हुकुमशाही कधी लादली नाही. तर त्यांनी सर्वसमावेशक विचारांतून घटनेची रचना केली आहे. त्यामुळेच या घटनेच्या संदर्भात सर्व भारतीयांमध्ये आदर निर्माण झाला पाहिजे. तो जाणीवपूर्व व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.
बाबासाहेबांनी दलितांसाठी, वंचितासाठी वेगळा प्रदेश मागितला नाही.तर याच देशात राहून स्वत:चा विकास साध्य करण्याचा त्यांचा निर्धार होता. त्यामुळेच आपले संविधान सर्वसमावेशक आहे. हे संविधान बदलण्याची तरतूदच नाही. त्यामुळे संविधान बदलणे अशक्य आहे. ज्यादिवशी संविधान बदलले जाईल, त्यादिवशी देशात दंगली होतील. संविधान इतके तकलादू नाही की कोणीही त्याला बदलू शकेल. त्यामुळे आपणही हा विश्वास बाळगला पाहिजे.
यावेळी बोलताना अर्जुन डांगळे म्हणाले की, आयुष्यात स्वत्व हे सर्वात महत्वाचे असते. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना ते स्वत्व दिले, एक ओळख निर्माण करून दिली. बाबासाहेबांनी लोकशाही ही जीवनपद्धती मांडली. तिचे सामाजिकरण व्हावे यासाठी विविध कायदे संविधानाच्या माध्यमातून देशाला दिले. राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, माणसाला माणूस म्हणून वागणूक देण्याचा अधिकार या संविधानाद्वारे दिला. त्यामुळेच जगाच्या पाठीवर व्दंव्द चालू असताना भारतात मात्र अजूनही स्थैर्य कायम आहे. आज संविधानविरोधी वातावरण देशात असले, तरी बाबासाहेबांचे विचार, त्यांची लोकशाही ही केवळ देशातच नव्हे तर जगात स्वीकाहार्य आहे. ते केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर संपूर्ण जगात मानव मुक्तीच्या विचारांना रूजवणारे नेते होते.
बाबासाहेब आंबेडकर क्रांतीकारक होते. संविधानाने वंचिताना, स्त्रियांना आणि सर्वच वर्गांना बरोबरीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळेच देशाचे संविधान हा सर्वसमावेशक आहे. आज धर्माच्या, श्रद्धेच्या नावावर समाजात फूट पाडून त्याचे राजकारण करणारे वातावरण असताना या पुरस्काराद्वारे संविधानाचा विचार प्रगल्भ करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. याप्रसंगी पुरस्कारार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.