उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाइन – मराठवाड्यात लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देवणी येथील दीपक माणिकराव सगर (४०, रा. देवणी) या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सगर यांना एक एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्यावर बँकेसह खाजगी कर्ज असल्याने व सततच्या नापिकीमुळे ते चिंताग्रस्त होते, असे नातेवाईकांनी सांगितले.
यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने ते अधिकच चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी सकाळी त्यांच्या शेतातच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आली. मयत सगर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.
उस्मानाबाद तालुक्यात राघुचीवाडी येथील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतकरी कल्याण वडजू गायके (वय ४३, रा. शांतीनिकेतन कॉलनी, उस्मानाबाद) यांची राघुचीवाडी शिवारात शेती होती.कर्जाचा वाढलेला बोजा अन् मुला-मुलींच्या शिक्षणावर होणारा खर्च यामुळे ते नैराश्यच्या गर्तेत अडकले होते. ‘पीकांना पाणी देवून येतो’ असे म्हणून ते शेताकडे गेले होते. मात्र सकाळी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.