वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – भाजप सरकारमुळे संविधान धोक्यात येत असल्याची ओरड विरोधी पक्ष करीत आहे. मात्र, विरोधकांची ही ओरड खरी नाही. संविधानाच्या रक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आम्ही सक्षम आहोत. संविधान वाचवण्यापेक्षा काँग्रेसने स्वत:चा पक्ष वाचवावा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते वध्र्यातील हिंदी विश्वविद्यालयाच्या व्याख्यान कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी हे वक्तव्य केले. जर शरद पवार आमच्या युतीत आले तर त्यांना उपपंतप्रधान करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करेन, अशी कोपरखळीही यावेळी आठवले यांनी मारली.
आठवले म्हणाले, संविधान जाळल्याने ते धोक्यात येण्याइतके कमजोर नाही. दलित हा शब्द अपमानकारक नाही. जो आर्थिक व सामाजिक मागासलेला आहे, तो दलित होय. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या कामगिरीवर जनता खूष आहे. देशात एकमेकांविरुद्ध लढण्याचे वातावरण तयार केले जात आहे. एकट्या मोदींविरुद्ध सर्व एकत्र येत आहे. मात्र त्याचा आम्हाला आनंदच आहे. त्यांना जे ६० वर्षांत जमले नाही ते मोदी सरकारने पाच वर्षांत करण्याचा प्रयत्न केला. भाजप, सेना व आरपीआय सरकारच्या काळात दलितांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या. इंदू मिलची जागा ताब्यात आली असून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षाही मोठे स्मारक ६ डिसेंबर २०२० पूर्वी पूर्ण होणार आहे. त्यामुळे २०१९ मध्येही मोदीच परत पंतप्रधान होतील.
दलितांना आरक्षण मिळत असल्याने त्यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. आर्थिक परिस्थितीत कमकुवत असलेल्यांसाठी २५ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. उच्चवर्णीयांना आरक्षण देऊन त्यांची उत्पन्न मर्यादा आठ लाखापर्यंत करावी. आरक्षणासाठी वारंवार होणाऱ्या आंदोलनांना तोंड देण्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी कायदा व्हावा म्हणून मी प्रयत्नशील आहे.
राम मंदिराबाबत आठवले म्हणाले, त्या जागेवर प्रथम बौद्धांचा अधिकार होता. कालांतराने हिंदू व नंतर मुस्लिमांचा ताबा झाला. सध्या असलेल्या वादावर न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढील धोरण ठरवावे. प्रकाश आंबेडकर व एमआयएम यांनी हातमिळवणी केली, पण त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेबांचे नातू असल्याने आम्ही त्यांचा सन्मानच करतो. ते जर आमच्या टीममध्ये आले तर त्यांना अध्यक्षपदी बसवून त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास मी तयार आहे, असे आठवले म्हणाले.