कवितेतून संविधानाचा जागर करण्याचा ‘लोकशाही काव्यमैफल’ हा अनोखा उपक्रम साहित्य सांस्कृतिक कट्ट्यातर्फे संविधान दिनानिमित्त सिंहगड रोड जवळील कल्पना चावला शाळेजवळील नाना-नानी पार्कमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे नारायण खरे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचनाने सुरवात झाल्यानंतर स्वातंत्र्याचा खरा अर्थ न समजल्याची खंत कवितेतून व्यक्त केली तर सचिन दुस्सल यांनी ‘संविधानाकडे मी कसे पाहू’ ही रचना सादर केली.
इतकेच नव्हे तर सुप्रिया सांगळे यांनी संविधान ही सर्वांची जबाबदारी असल्याचे कवितेतून सांगितले. कु. काजल पवार यांनी महापुरुषांच्या जातीतील वाटणीवर बोट ठेवणारी रचना सादर केली. डॉ. जितेंद्र शिंदे यांनी संविधानाची प्रत जाळल्याचा निषेध करणारी रचना मांडली. स्त्री भ्रूण हत्येवर भाष्य करणारी कविता शाहीर महादेव खंडागळे यांनी सादर केली तर डॉ. सारिका शिंदे यांनी स्त्रीची व्यथा कवितेद्वारे मांडली. डॉ. भालचंद्र सुपेकर यांच्या मार्मिक गजलेने या मैफलीची सांगता झाली.
याचबरोबर भारतीय घटनेच्या उद्देशिकेचे भव्य सामूहिक वाचन उपक्रम महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ३० शैक्षणिक आस्थापनातर्फे आयोजित करण्यात आला होता. दरम्यान इंग्रजी ,मराठी ,हिंदी भाषेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संस्थेचे १० हजार विद्यार्थी, प्राचार्य , प्राध्यापक, शिक्षकवर्ग या उपक्रमात सहभागी झाले होते. सोमवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आझम कॅम्पस येथील मैदानात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम , नियामक मंडळाचे सदस्य , विभागप्रमुख ,प्राध्यापक -शिक्षक वर्ग उपस्थित होता.
इतकेच नव्हे तर विद्यानगर येथील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने अायाेजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात ७ हजार विद्यार्थी व पालकांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुहिक पठण केले. त्याचबराेबर या उद्देशिकेच्या हजाराे प्रती सुद्धा वाटण्यात अाल्या. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर उपस्थित हाेते.
संविधान दिन
संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन) हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता. भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर ला तयार झाली असली तरी ही घटना २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय जनतेला अर्पण का करण्यात आली. लाहोर येथे झालेल्या काँग्रेस च्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी पहिल्यांदा करण्यात आली आणि २६ जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात साजरा केला जाईल असा ठराव झाला होता. पण आपल्याला प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळाले ते १५ ऑगस्ट ला, त्यामुळे इतिहासातील या दिवसाचे महत्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने २६ नोव्हेंबर ला घटना तयार होऊन ती २६ जानेवारी ला जनतेस अर्पण करण्यात आली आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले.