मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – काँग्रेसला हरवण्यासाठीच मी भाजपात आलो आहे. मात्र संविधान बदलले जात आहे, असे मला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी मी भाजपा सोडेन, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात दिला.
यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह सुरेश वाडकर, विश्वस्त अजय वैद्य, रिपाइंचे अध्यक्ष गौतम सोनवणे उपस्थित होते. यावेळी बोलताना आठवले म्हणाले, शिवसेना व भाजपा यांची युती झालीच पाहिजे, नाहीतर त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल. जर नाही झाली, तर मी मुंबईतून निवडणूक लढवणार आहे. भाजपा-शिवसेना युती झाली, तर रिपाइंला लोकसभेच्या दोन जागा सोडल्या पाहिजेत.
युती नाही झाली, तर चार जागा सोडल्या पाहिजेत. मी निवडणूक लढवली, तर शिवसेनेचा पराभव नक्की करू शकतो. रिपाइंला लोकसभेत पार्टीचे खासदार आणायचे आहेत. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची वंचितांची आघाडी, ही नेत्यांची आघाडी आहे, जनतेची आघाडी नाही. त्यामुळे त्या आघाडीला निवडणुकीत काहीच फायदा होणार नसून त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे. रिपाइंच्या ऐक्यावर बोलताना आठवले म्हणाले, आमचे गल्लीत ऐक्य झाले, तर दिल्लीपर्यंत ऐक्य नक्की होईल. त्या ऐक्यासाठी मंत्रीपदही सोडेन, असे आठवले म्हणाले.यावेळी बोलताना मुंबई मराठी पत्रकारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे म्हणाले, आठवले यांनी आरक्षणाच्या प्रश्ना वर सर्वप्रथम आवाज उठवला.
आठवले सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांच्या दालनाबाहेर गर्दीच्या व जनतेचे प्रेमाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. मराठा सवर्ण यांना आरक्षण मिळावे, म्हणून सर्वप्रथम आठवले यांनीच आवाज उठवला होता, असेही वाबळे म्हणाले. तर अजय वैद्य यांनी आठवले यांच्या स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या प्रसिद्धीपत्रकाच्या आठवणींना उजाळा दिला. संयुक्त कार्यवाह सूरज वडवकर यांनी आभार प्रदर्शन केले..