लातूर : बहुजननामा ऑनलाइन – शोषणमुक्त समाज निर्माण करणे, हे बाबासाहेबांचे स्वप्न होते आणि त्याच स्वप्नांच्या पूर्ततेसाठी शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी बाबासाहेबांच्या विचारांची कास धरावी, असे आवाहन लसाकमचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. माधवराव गादेकर यांनी केले.
अहमदपूर येथे समतावादी सांस्कृतिक चळवळ व लसाकमच्या वतीने राजमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व सत्यशोधकी मुक्ता साळवे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त समतावादी कविसंमेलन व जीवन गौरव सन्मान समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कवी विलास सिंदगीकर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पं. स. सभापती सौ. अयोध्याताई केंद्रे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आर. एस. वाघमारे, दलित मित्र उत्तमराव माने, एन. डी. राठोड, डी. जी. वरवटे, सोमेश्वर कदम उपस्थित होते. प्रा. डॉ. माधवराव गादेकर, ॲड. टी. एन. कांबळे, ॲड. आर. एस. वाघमारे, दलितमित्र उत्तमराव माने यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जवळपास २५ कवींनी शेतकरी आत्महत्या, दलित व ग्रामीण साहित्य, नापिकी, राजकीय विडंबन आदी विषयांवर कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य तुकाराम हारगिले यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा. चंद्रकांत मोरे यांनी केले. रमेश भालेराव यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी संयोजक नरसिंग सांगवीकर, डी. एस. वाघमारे, प्रा. डॉ. मारोती कसाब, अंकुश सिंदगीकर, प्रफुल्ल धामणगावकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, अंकुश पोतवळे, विनोद नामपल्ले, विनायक ढवळे, रामकिशन गोरले, कुंदन हारगिले आदींनी परिश्रम घेतले.