सांगली : बहुजननामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे केंद्रबिंदू आहेत. शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये एक प्रकारचे भावनिक नाते असून शिवाजी महाराज व मराठी माणूस हे मानसिक व भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेला आहे. महाराजांचे धर्म, न्याय, सहिष्णुता हे मुल्ये जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव थोरात यांनी केले.
ते मराठा समाज संस्थेच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजांना विसरण्याची वेळ आली आहे काय?’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी डॉ. थोरात यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मराठा समाजचे अध्यक्ष ॲड. उत्तमराव निकम यांनी केले. डॉ. थोरात म्हणाले, २१ व्या शतकात राहणारा मराठी माणूस आजही मानसिक व भावनिकदृष्ट्या छत्रपतींशी जोडला गेला आहे.
शिवाजी महाराजांच्या अस्मितेचे खरे स्वरुप समजून घेवून त्याचा आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात योग्य वापर करु शकतो का नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. शिवाजी महाराजांची प्रेरणा मराठी माणसाच्या मरण्यासाठी जेवढी तीव्र आहे तेवढी ती जगण्यासाठी तीव्र नाही. जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे, तोपर्यंत शिवाजी महाराजांना विसरता येण्याची वेळ येवू शकत नाही. त्यांच्या लढाया व शौर्याच्या पलिकडे जावून शिवाजी महाराजांचे स्मरण केले पाहिजे. त्यांची मूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणली पाहिजे. ते म्हणाले, शिवाजी महाराजांच्या वेळी परिस्थिती प्रतिकूल होती. त्या परिस्थितीत गरिबांना कोणतेही हक्क, अधिकार नव्हते. त्यांना प्रशासनात कोणतेही स्थान नव्हते. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. नैतिक धैर्याच्या बळावर मूल्यविचार व आदर्शावर महाराज उभा राहू शकले.
आश्वासन आणि कृती यांच्यामध्ये कोणतेच अंतर शिवाजी महाराज ठेवत नव्हते. शिवाजी महाराज यांच्या राज्याचे धर्म, न्याय आणि सहिष्णुता हे तीन आधारस्तंभ असल्याचेही डॉ. थोरात यांनी स्पष्ट केले. या कार्यक्र मासाठी रिझर्व्ह बॅँकेच्या माजी संचालक डॉ. उषा थोरात, डॉ. थोरात यांचे इंग्लंडमधील मित्र हॉवर्ड जोन्स, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. (दादा) पाटील, मराठा समाज संस्थेचे माजी अध्यक्ष डी. के. पाटील, प्रकाश चव्हाण, ए. डी. पाटील उपस्थित होते. यावेळी माजी अध्यक्ष तानाजीराव मोरे, कर्मचारी गणेश पाटसुते यांचा सत्कार करण्यात आला.