सातारा : बहुजननामा ऑनलाइन – आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत मात्र त्यांच्या विषयी आमच्यापुढे खोटे इतिहासाची पेरणी केली जात आहे असे वक्तव्य करत विकृत विद्वानांच्या वादात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विनयभंग झाला असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी यांनी केला आहे. साताऱ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर यांनी लिहिलेला शिवरायांचा इतिहास हा एक प्रवाह आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या वादामुळे इतिहास विकृत बनतो आहे याचा विकृत विद्वानांच्या वादात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विनयभंग झाला असल्याचं ते म्हणाले.
साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या मैदानावर 20 व्या सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी, संस्कृतीची पालखी वाहत असताना निष्ठा जपावी लागते असे सांगून सबनीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात इतिहासावर भाष्य केले. इतकेच नाही तर, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर लेखकांच्या भूमिकेत त्यांच्याकडून शिवरायांच्या इतिहासाचा विनयभंग झाला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
दरम्यान या ग्रंथमहोत्सवात बोलताना सबनीस म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी मी महाराष्ट्रभर फिरून नव्याने मांडणी करत आहे त्यांच्याविषयी चुकीच्या पद्धतीने इतिहास सांगितला जात असल्यामुळे तो विकृत बनतो आहे त्याला आता आपण इतिहास म्हणायचे का…? शिवाजी महाराजांनी आठ लग्ने झाली त्यांनी हिंदू धर्म सोडला होता त्यांचा विवाह अस्पृश्य महिलेशी झाला होता अशा पद्धतीने आपल्यासमोर इतिहास सांगितला जात आहे विवेकी इतिहास लोकांसमोर आणणे हे आपले कर्तव्य आहे.” इतकेच नाही तर, ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितलं जात आहे. याच विकृत विद्वानांनी छत्रपतींचा इतिहास बिघडवून टाकला आहे’ असेही ते म्हणाले.
यानंतर खासदार उदयनराजे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “जोपर्यंत आपण वाचन करत नाही तोवर आपल्या विचारात व्यापकता येणार नाही. वाचनाने दूर दृष्टी प्राप्त होते. स्पर्धेत टिकायचे असेल तर वाचन आवश्यक आहे. साताऱ्यातील ग्रंथमहोत्सवामुळे लोकांना वाचनाची सवय लागली आहे. त्यांच्या विचारात व्यापकता येण्यास मदत होत आहे.” इतकेच नाही तर पुढे ते म्हणाले की, “आपले वाचन वाढवायला हवे. जात-पात बाजूला करून आपण राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करणे आवश्यक आहे. आपले भवितव्य वाचनात दडले आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचले पाहिजे आणि ते वाढवले पाहिजे. संकुचित विचार दूर करायचे असतील तर त्यासाठी पुस्तकं वाचणं आवश्यक आहे.” याशिवाय, ‘युवकांनी प्रत्येक मोठ्या माणसांची आत्मचरित्र वाचायला हवीत तरच त्यांचे भवितव्य उज्ज्वल असणार आहे’ असंही उदयनराजे म्हणाले.
यावेळी सभामंचावर ग्रंथ महोत्सवाचे कार्यवाह डॉक्टर यशवंत पाटणे आदि उपस्थित होते.