सातारा : बहुजननामा ऑनलाइन – देशात हुकूमशाही न येण्यासाठी भाजपला देश व राज्यातून हुसकावून लावण्यासाठी सज्ज रहा. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्यामुळे निवडणुकीचा निकालही स्पष्ट आहे. राफेल विमान खरेदीच्या घोटाळयात नरेंद्र मोदी तुरुंगात जाणे केवळ बाकी आहे, असा घणाघात राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. गोटे, ता. कराड येथे हाजी रज्जाकभाई पटेल यांनी आयोजीत केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, भाजपाने घोषणा केलेल्या योजनांपैकी कॉंग्रेसच्या काळातील ८0 टक्के योजनांची नांवे बदलून त्या पुढे नेल्या आहेत. याव्यतिरिक्त मोदींनी दाखवलेली सोनेरी भारताची स्वप्ने आणि आश्वासने व्यावहारीक होती का हे तपासण्याची गरज आहे. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा केल्याचे उघड झाल्याने त्यांना निवडणुकीत जाहीरनामा प्रसिध्द करणे मुश्कीलीचे ठरणार आहे. त्यामुळे सत्तेसाठी धार्मिक दंगली घडवायच्या व विरोधकांमध्ये वितुष्ठ आणायचे प्रयत्न सरकार करत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. आनंदराव पाटील होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, जि.प.सदस्य निवासराव थोरात, मंगल गलांडे, पं.स. सदस्य उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, विद्याताई थोरवडे, सरपंच यास्मीन पटेल, उपसरपंच अविनाश पवार, निसार मुल्ला, महंमद आवटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अल्लाउद्दीन देसाई, सुभाष चव्हाण, शिवाजीराव जमाले, हणमंतराव भोपते, रवींद्र बडेकर यांची उपस्थिती होती.