अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला यापुढे मनुस्मृती जाळण्याचे आंदोलन केले जाईल असे वक्तव्य केले आहे.
माजी आ. जयंत ससाणे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भुजबळ नगरमधील श्रीरामपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, समता परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला यापुढे मनुस्मृती जाळण्याचे आंदोलन केले जाईल. होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. दिल्लीत मध्यंतरी संविधान जाळण्यात आले; मात्र, कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. येथे मात्र लगेच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. मला आलेले पत्र हे भ्याडपणाचे लक्षण आहे, मी अशा पत्रांना कधीही भिक घातली नाही आणि घालणारही नाही,असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
इतकेच नव्हे तर नगर-पुणे लोकसभेच्या जागा बदलासंदर्भात चर्चा चालू असली, तरी दक्षिण नगरची जागा अद्याप राष्ट्रवादीने सोडलेली नाही. २०१९ ला राज्यात व केंद्रात सत्तापालट होईल. लोकसभेच्या १७-१७ जागांवर राष्ट्रवादी व काँग्रेसचे एकमत झाले आहे. १४ जागांसंदर्भात चर्चा सुरू असून यातील काही जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. यासंदर्भात २ नोव्हेंबरला बैठक होणार आहे.
विशेष म्हणजे दक्षिण नगर व पुणे येथील जागेच्या अदलाबदलीबाबत विचारले असता दक्षिण नगरची जागा अजिबात सोडलेली नाही. मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, समन्यायी पाणीवाटप आघाडी सरकारच्या काळात झाले असले, तरी त्याचे वेगवेगळे अर्थ लावण्यात आले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात दुरूस्ती होईल. पुढील कारवाईसाठी थांबावे लागेल. कोणाचा नसला तरी आमचा सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.