पुणे : बहुजननामा ऑनलाईन- (याेगेश सांगळे)-महात्मा जोतिबा फुले हे बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे, बहुजन समाजाला विकासाच्या मुख्य धारेत आणणारे पाहिले नेते होत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना गुरुस्थानी मानत. त्यांचे कार्य महान आहे. त्यांच्या कार्याबद्दल आपणा सर्वांना काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार होणे गरजेचे आहे. सर्व बहुजन काही मोजक्याच छत्राखाली एकत्र येऊ शकतात त्यांपैकी एक महात्मा जोतिबा फुले आहेत. त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया.
१) महात्मा फुले यांना ‘स्त्री शिक्षणाचे आद्यजनक’ असे म्हंटले जाते. मुलींसाठी आणि मागासलेल्या समाजातील मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. स्त्री-पुरूष सर्वांना शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते शिक्षण हा मुक्तीचा प्रमुख मार्ग आहे. शिक्षणाचे महत्व सांगताना ते म्हणतात,
विद्ये विना मती गेली।
मती विना निती गेली॥
निती विना गती गेली।
गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले।
एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
फुले बहुजनांच्या मागासलेपणाचे मुख्य कारण शिक्षणाचा अभाव हे सांगतात. एवढेच नाही तर त्यांनी १९व्या शतकाच्या मध्यावरंच बारा वर्षाच्या आतील मुलामुलींना मोफत शिक्षण देण्यात यावी अशी मागणी केली होती. याचबरोबर, ‘शिलसंवर्धन, सत्यनिष्ठा, नितीमत्ता, व्यवहारज्ञान यांवर शिक्षणात भर दिला पाहिजे’. यावरून आपल्याला हे समजते की त्यांनी केवळ घोकंपट्टी करायला लावणाऱ्या शिक्षणाचा पुरस्कार नाही केला तर शिक्षणाने माणूस घडला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
इतकेच नव्हे तर कोणताही धर्म ईश्वराने निर्मिलेला नाही. चातुर्वर्ण्य आणि जातीभेद ही मानवाचीच निर्मिती आहे. ते ईश्वराला निर्मिक म्हणतात. ते धर्माला ‘सत्यधर्म’ असे संबोधतात. ‘सत्य’ हाच सर्वांचा धर्म आहे. तसेच देवळातील पुरोहितांना ते विरोध करतात. ते म्हणतात, ‘सर्वसाक्षी जगतपती, त्यास नकोच मध्यस्ती’. ज्याप्रमाणे आपल्या आई बापाला भेटायला किंवा प्रसन्न करायला कुणाचीही गरज नसते. त्याच प्रमाणे ईश्वराला प्रसन्न करण्यासाठीही कुणा पुरोहिताची गरज नसते. महात्मा फुल्यांनी समाजसुधारनेसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्यात प्रवेश मिळण्यासाठी वरील तत्व मान्य करण्याची अट होती. यावरून फुले धर्म किंवा श्रध्दा या व्यक्तीच्या वैयक्तिक गोष्टी असल्याचे मानत. ते निर्मिक आणि माणूस यांचे संबंध थेट असल्याचे सांगतात. ते संबंध कसे असावेत हे कुणीही ठरवू नये असे ते स्पष्टपणे सांगतात.
महात्मा फुलेंनी जातीव्यवस्थेवर सतत टीका केलेली दिसते. त्यांनी जातिव्यवस्थेचा निषेध केला. अस्पृश्यतेला विरोध केला. समाजाला काळीमा फासणाऱ्या यांसारख्या प्रथा संपवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यासाठी अस्पृश्य समाजातील लोकांसाठी त्यांनी आपल्या घरातील हौद पाणी भरण्यासाठी खुला केला. अस्पृश्यतेवर टिका करताना त्यांनी वेदानांही लक्ष्य केले. अस्पृश्यता वेदांमधील आख्यायिकांमधूनच जन्माला आली. वेद चुकीच्या गोष्टी पसरवतात. असे ते म्हणत. तसेच अवतार कल्पनेवरही त्यांनी प्रचंड टिका केली. तसेच ‘दलित’ या शब्दाचा सर्वप्रथम वापर महात्मा फुल्यांनी केला.
स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. इथे त्यांनी केवळ बहुजनांच्या स्त्रियांचा विचार नाही केला. तर उच्चजातीय स्त्रियांनाही त्यांनी आसरा दिला. स्त्री कुठल्याही जाती समाजातील असो तीचे स्थान दुय्यमच असते असे त्यांचे मत होते. आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिकवून त्यांच्यामार्फत मुलीपर्यंत शिक्षणाची गंगा त्यांनी पोचवली. विधवा स्त्रियांच्या मुलांसाठी त्यांनी अनाथाश्रम सुरू केला. त्याला त्यांनी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ असे नाव दिले. त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी त्यांची आयुष्यभर साथ दिली. किंबहुना सावित्रीबाई फुलेंचे विचार आणि कार्य यांचा आढावा स्वतंत्ररित्या घ्यावा लागतो. पहिली भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सारा देश त्यांना ओळखतो.
महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांना नेहमी वाचा फोडली. त्यासाठी त्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक लिहिले हे आपण जाणतोच. १९८५ साली स्थापन झालेल्या काँग्रेसवर त्यांनी ती संघटना शेतकरी आणि सामान्यजनांना सामावून घेत नाही म्हणून टिका केली. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत देशातील पहिली कामगार संघटना उभी केली. त्यामागे प्रेरणा फुल्यांची होती. फुलेंनी शेतकरी कामगार यांच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढा दिला. महात्मा फुले हे असे समाजसुधारक होते ज्यांनी समाजाच्या सर्व क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न, शिवाज महाराजांचा पोवाडा इ. साहित्य लिहिले. ते वाचले पाहिजे. त्यांच्या विचारांचा प्रसार महाराष्ट्रभर- भारतभर झाला पाहिजे.