मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेले मराठा समाजाचे स्वतंत्र आरक्षण लागू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांनी मराठा समाजाला SEBC या विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे.
हिवाळी अधिवेशन सुरु होण्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचे जाहीर केले होते, मात्र ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांनी मराठा समाजाला SEBC या विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात ओबीसी फेडरेशनच्या नेत्यांची आजबैठक पार पडली. या बैठकीला ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, प्राध्यापक श्रावण देवरे, धोबी समाजाचे नेते बालाजी शिंदे, आमदार हरिभाऊ राठोड आणि विद्रोही कवी सचिन माळी उपस्थित होते.
यावेळी अहवाल देणारा मागासवर्ग आयोग घटनाबाह्य पद्धतीने गठित केल्याचा आरोप ओबीसी फेडरेशनच्या नेत्यांनि केला आहे. याचबरोबर सर्वेक्षणासाठी नेमलेल्या संस्था मराठा आणि ब्राह्मण समाजाशी संलग्न असल्याचा दावा ओबीसी फेडरेशनच्या नेत्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बैठकीत मराठा आरक्षणासंबंधी सर्व आक्षेप नोंदवून पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण बहाल करण्याआधी लोकसंख्येच्या आधारावर जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
इतकेच नव्हे तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचे मुख्यमंत्र्यांनी वचन दिले आहे. परंतु तसेहि होणार नसेल तर काय करणार ? याचबरोबर मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचं काय होणार ? आरक्षणाचा निर्णय कोर्टाच्या कसोटीवर टिकणार का ? असे अनेक प्रश्न ओबीसी फेडरेशनने उपस्थित केले आहेत.