रत्नागिरी : कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणात संभाजी भिडे यांना सरकार पाठिशी घालत आहे. अजूनही सरकार भिडे यांना अटक करण्यात टाळाटाळ करत आहे. या सरकारचा राज्यघटनेवर विश्वासच नसून डॉ. आंबेडकरांनी दहन केलेल्या मनुस्मृतीचा पुरस्कार करणारे हे सरकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत केली.
रत्नागिरी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी जयदेव गायकवाड रत्नागिरी दौऱ्यावर होते. पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जयदेव गायकवाड म्हणाले, देशात आणि राज्यात सुरू असलेल्या विद्यमान सरकारच्या कामकाजाबद्दल जनता प्रचंड अस्वस्थ आहे. सरकार उघडपणे मनुस्मृतीचा पुरस्कार करत आहे. १९२७ ला डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती. भाजप सरकार मात्र सत्तेवर आल्यानंतर उघडपणे मनुस्मृतीचा पुरस्कार करत आहे. लोकशाहीला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. या सरकारला राज्यघटना देखील मान्य नाही. संभाजी भिडेंना सरकारचेच अभय आहे. यामुळेच भिडे गुरूजींनी कोरेगाव-भीमा दंगल घडवली. भिडे गुरूजींविरोधात कारवाई व्हावी यासाठी लाखोच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले. परंतु, अद्याप भिडे गुरूजींना अटक करण्यात आलेली नाही. भिडे गुरूजी स्वत: मनुस्मृतीवादी विचाराचे आहेत. यामुळेच सरकारचे त्यांना अभय मिळत आहे.
विद्यमान सरकारला चार वर्षे होऊन गेली आहेत. परंतु, लोकांचा पुरता भ्रमनिरास झालेला आहे. लोकांचे आर्थिक पातळीवर फार मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय सामाजिक नुकसान न भरून येण्यासारखे आहे. लोकशाहीला वेगळे वळण देण्याचा डाव रचला जात आहे. जनता अस्वस्थ असून लोक बदल घडवण्यासाठी वाट पाहत आहेत, असे गायकवाड म्हणाले.