अहमदनगर: बहुजननामा ऑनलाईन – नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीने खेळलेल्या राजकारणाचा अजिबात धक्का बसलेला नाही. भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक राजकीय संबंध जुनेच आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचा जन्मही या संबंधातूनच झाला आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर पदाच्या निवडणुकीतील भाजप राष्ट्रवादी अभद्र युतीचा समाचार घेतला. राष्ट्रवादीकडून कारवाईचे केवळ ढोंग केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेल्या शिवसेनेला महापौर पदापासून दूर ठेवण्यात आले आहे. या राजकीय घडामोडीबाबत शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. लेखात म्हटले आहे की, ‘बारा महिने तप केलं अन् गाढवासंगं पाप केलं…’ या कवितेच्या ओळींचा आधार घेऊन उद्धव यांनी भाजप, राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. २०१४ साली याच राष्ट्रवादीने भाजपला सरकार स्थापनेसाठी असाच बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. म्हणजे भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे. आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत, असे ते उगाच सांगत असतात. यानिमित्ताने दोघेही नागडे झाले आहेत व महाराष्ट्र त्यांच्यावर हसत आहे.
भाजपाची खरी भ्रष्टवादाशी
एका बाजूला म्हणायचे शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. दोघांची विचारधारा हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होता कामा नये व दुसर्या बाजूला राष्ट्रवादीशी अनैसर्गिक, अनैतिक संबंध ठेवून सत्ताभोग घ्यायचा. खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे, हे राष्ट्रवादीशी संबंध ठेवून भाजपने सिद्ध करून दाखविले आहे.
विखे पाटलांचा आतून कीर्तन वरून तमाशा
या निवडणुकीत काँग्रेस पक्षही तटस्थ राहिला म्हणे. राधाकृष्ण विखे-पाटलांचा हा जिल्हा; पण त्यांचेही आतून कीर्तन वरून तमाशा असेच सुरू असते. राष्ट्रवादीच्या पायात त्यांचीही टांग आहेच. भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे.
राष्ट्रवादीकडून कारवाईचे डोंग
नगरचे चित्र असे आहे की, सासरा भाजपात, तर जावई राष्ट्रवादीत, हे दोघे एकत्र आले. राष्ट्रवादी व भाजपचे लफडे नव्याने समोर आले. आता म्हणे राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांवर कारवाई होणार आहे. हे सर्व ढोंग आहे.