जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – भाजप शिवसेना सरकारने वंसतराव नाईक महामंडळ बंद पाडले तसेच भटक्या विमुक्तांना आरक्षण देऊ, बॅँक खात्यात १५ लाख जमा करु अशा विविध सवलतींची खैरात करणारे आश्वासने या सरकारने दिली ; परंतु प्रत्यक्षात हातात काही मिळाले नाही. उलट भटक्या विमुक्त यांच्या अन्नात माती टाकण्याचे काम सरकारने केले अशी टिका राष्ट्रवादी भटक्या विमुक्त विभागाचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यात ११४ जाती भटक्या विमुक्तांच्या असून अनेक समाज बांधव अशिक्षीत आहेत. वाड्या वस्तीवर राहुन पारंपारिक व्यवसाय करुन उदरनिर्वाह करीत असतात, शरद पवार यांनी या राज्यात सर्वाधिक लक्ष या भटक्या विमुक्तांकडे दिले. मंडल आयोगाची स्थापना त्यांनी केली.
१६ हजार ६२३ आश्रम शाळा पवार साहेबांच्या काळात सुरु झाल्यात, असे महत्त्वपूर्ण निर्णय काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेत. परंतु बारामतीत २०१४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री व पंतप्रधान यांनी आरक्षणाची घोषणा केली ; त्यानंतर काळा पैसा भारतात आणु प्रत्येक व्यक्तींच्या खात्यात १५ लाख जमा होतील, अशा घोषणा केल्या आणि या जनतेने भरभरुन भाजपाला मतदान केले. परंतु प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही. उलट या सरकारने वसंतराव नाईक महामंडळ बंद पाडले. हे पाप या सरकारचे आहे. राज्यात तांडा वस्तीत जावून जनजागृती सुरु असल्याचे हिरालाल राठोड यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत या फेकू सरकारला बंजारा समाज जागा दाखविणार असल्याचे ते म्हणाले. राईनपाडा येथे पाच भिक्षुकांची हत्या झाली. त्यानंतर राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलने आवाज उठविल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक बोलावून मयतांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत, २ एकर जमीन, घरकुल देणार अशी आश्वासाने दिली गेली. परंतु या कुटुंबियांना आद्यापपर्यंत काही मदत मिळाली नाही. केवळ घोषणा करणारे हे मुख्यमंत्री असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, माजी आ. संतोष चौधरी, कल्पना पाटील, योगेश देसले, संजय गरुड, सविता बोरसे, ललित बागूल आदी उपस्थित होते.