मुंबई – आगामी निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघास वाटत नसल्याने संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बकरा बनविण्यास सुरूवात केली आहे, असे विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अॅड. आंबेडकर यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
मोदी आणि संघाविषयीच्या या वक्तव्याला पुष्टी देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ज्येष्ठ स्वयंसेवक भय्याजी जोशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांचे नाव न घेता सत्तेत असणाऱ्यांना तेच सर्वेसर्वा असल्याचे वाटते, तसेच सध्या राजा कोण, हे सर्वांना माहीत असल्याचे विधान केले होते. नोटबंदीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला. तसेच सर्जिकल स्ट्राइकची सत्यता वादग्रस्त ठरल्याने संघाने हात झटकले असावेत आणी मोदी यांनाच सर्वस्वी जबाबदार धरून आपली प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न केला.
तसेच राज्य आणि देशातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आंबेडकर म्हणाले, राज्यात होऊ घातलेला मंत्रिमंडळ विस्तार हे गाजर आहे. या मंत्रिमंडळात नव्याने एकाचाही समावेश होईल असे वाटत नाही.
राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षाला शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही. इंधन दरवाढीच्या नावाखाली बोलविलेल्या बैठकीचा कार्यक्रमा वेगळाच असून त्याचा मूळ उद्देश आपण दोन दिवसात जाहीर करणार आहे. राज्यातही शेतकरी अडचणी असतांना येथे व्यापाऱ्यांना अभय आहे. याविरोधात काँग्रेसला आवाज उठविता आला नाही. सरकारच्या मर्जीने शेतकऱ्यांची लूट होत असताना कॉंग्रेस त्याबाबत काहीही करू शकली नाही. मी टू मोहिमेचे त्यांनी समर्थन केले. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल महिला बोलू लागल्या ही चांगली गोष्ट आहे. काही महिलांकडून त्याचा दुरूपयोग होत आहे. नाहक महिलांनी कोणाची बदनामी करू नये, असे आवाहनही अॅड. आंबेडकर यांनी केले.
राम मंदिर : मुख्य पुजारी संत्येंद्र दास यांनी भाजपला सुनावले