बेळगाव : वृत्तसंस्था – HIV या रोगाबाबत आजही समाजामध्ये नकारात्मकता आहे . तसेच प्रबोधनाचा अभाव दिसून येतो. याचाच प्रत्यय कर्नाटकातील हुबळीपासून सुमारे २० किमी दूर असलेल्या मोराब गावातील एका घटनेद्वारे आला आहे. या गावातील HIV बाधित महिलेने गावातीलच तलावात उडी मारून आत्महत्या केली. पण नंतर या गावातील लोकांनी या तलावाचे पाणी पिण्यास नकार दिला आहे. प्रशासनाने गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न देखील केला मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरले. आता संपूर्ण तलाव रिकामा करुन पुन्हा मलप्रभा कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, २२९ नोव्हेंबरला एका महिलेचा मृतदेह तलावात आढळून आला होता. महिलेने आत्महत्या केल्यामुळे पाणी बाधित झाल्याची अफवा लोकांमध्ये पसरली. ग्रामस्थांनी पाणी पिण्यास नकार दिला. ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासनाला तलाव रिकामा करण्यास सांगितले. प्रशासनातील लोकांनी पाणी पिले. तरीही ग्रामस्थांनी ऐकले नाही. अखेर प्रशासनाने २० सायफन ट्यूब्स आणि पाण्याच्या चार मोटारींनी तलाव रिकामा करण्यास सुरुवात केली आहे.
मृतदेह सडलेल्या अवस्थेत त्यामुळे पाणी संक्रमित अशी धारणा
मोराब येथील ग्रामस्थ मुट्टन्नाने सांगितले की, त्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. गावातील लोकांना संक्रमित पाणी प्यायचे नाही. जर हा मृतदेह सामान्य व्यक्तीचा असला असता तर लोकांनी पाणी पिलेही असते. परंतु, ही महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह होती. त्यामुळे कोणालाच हे पाणी प्यायचे नाही. ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील यांनी तलावातील ६० टक्के पाणी अद्याप बाहेर काढायचे राहिले असून यासाठी किमान ५ दिवस लागतील असे म्हटले.
८ डिसेंबरला मलप्रभा कालवा बंद होणार आहे. त्यामुळे ६ डिसेंबरपर्यंत पाणी बाहेर काढण्याचे काम होईल. तलाव भरायला वेळ लागेल. त्यामुळे नावलगुंडचे तहसीलदार हल्लूर यांनी मलप्रभा कालव्यातून तलाव भरण्यासाठी २० डिसेंबरची मुदत मागितली जाणार असल्याचे सांगितले.