अकोला : बहुजननामा ऑनलाइन
सध्या देशापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या आर्थिक संकटातून देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असून स्थैर्य असलेल्या पक्षांची सत्ता येणे महत्त्वाचे आहे. देशाच्या हितासाठी युती करण्यास भारीप सकारात्मक आहे. मात्र युतीच्या चर्चा केवळ माध्यमांमध्ये होत आहेत. प्रत्यक्षात काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापर्यंत चर्चा पोहोचलीच नाही. समझोता करणे हे आमच्या हिताचे नाही. मात्र देशापुढील संकट टाळण्यासाठी आम्ही समझोता करण्यासही तयार आहोत, असे भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेत ॲड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. आंबेडकर म्हणाले, सरकारने राममंदीर, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख टाकणे, नोटबंदी आदी माध्यमातून जनतेची दिशाभूल केली आहे. आता शहरी नक्षलवादाची संकल्पना बाहेर आली असून या माध्यमातून तरूणांचे डोके भडकाविण्याचे काम सरकार करत आहे. देशातील ७५ हजार कुटूंबांची मालमत्ता ५०० कोटीच्या जवळपास आहे. हे कुटूंब पोलीस, टॅक्स अधिकारी, इडी, सीबीआयच्या भितीपोटी परदेशात गेले आहेत. ही कुटुंब विदेशात जाऊन आपली मालमत्ता विकत आहेत. अकोल्यातसुध्दा भाजपाच्या फायनान्ससरच्या घरावर धाड पडली आहे. पोलिसांनी सनातन्यांच्या घरातून हत्यारे जप्त केल्यानंतर आता कुठे मुख्यमंत्री त्यांना नक्षलवादी म्हणत आहे.
भाजपच्या राजकारणामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे देश वाचविण्यासाठी विविध पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही सकारात्मक आहोत. मात्र इतर पक्षांनी तशी पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. डॉलरचा तुटवडा निर्माण करून डॉलरची किंमत वाढविण्यात आली. येत्या दोन दिवसात देशाचा शेअर बाजार गडगडण्याची शक्यता आहे. देश प्रचंड आर्थिक संकटात लोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाला विविध संकटातून वाचवायचे असेल तर त्यासाठी केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटविणे आवश्यक आहे. त्यांच्यावर पंतप्रधान पदाचा ताण वाढला असून ते अनेक बेताल वक्तव्य करत आहेत. हिंदूत्ववाद्यांनीच आता त्यांना बाजूला करायचे की नाही ते ठरविण्याची वेळ आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. या पत्रकार परीषदेला प्रदेश महासचिव युसुफ पुंजानी, आ. बळीराम सिरस्कार, जिल्हा परीषद अध्यक्षा संध्या वाघोडे, प्रदिप वानखडे, प्रा.डॉ.प्रसन्नजीत गवई आदी उपस्थित होते.