वंचित बहुजन आघाडीतर्फे नागपूर येथे अर्थव्यवस्था अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. इतकेच नव्हे तर पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव जाणुनबुजून अडकविण्यात आले. मात्र याचे उत्तर भाजप सरकारला निवडणुकीत मिळेल. याचबरोबर आम्ही भाजपाला राज्यात दोन आकडी जागांवर आणू. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना तर बेकायदेशीरपणे एके-५६ बाळगल्याच्या प्रकरणी आम्ही नागपूरच्याच तुरुंगात टाकू असे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
याचबरोबर एखाद्या व्यक्तीकडे चाकू सापडला की त्याच्याविरोधात त्वरित गुन्हा दाखल करण्यात येतो. विजयादशमीच्या दिवशी सरसंघचालक तर खुलेआमपणे एके-५६ ची पूजा करतात. मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात विलंब का होत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर जर सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालाकावर गुन्हा दाखल केला नाही तर सरकारदेखील सहआरोपी होईल असेही त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे काँग्रेस व भाजपा दोन्ही पक्षांना नक्षलग्रस्त भागातील खनिजसंपत्ती लुटायची आहे. म्हणून सलवाजुडुम राबविण्यात आला आहे, असा आरोपही त्यांनी केला. इतकेच नव्हे तर ऊर्जित पटेल यांच्या जागी ‘आरबीआय गव्हर्नर’ म्हणून शक्तिकांत दास यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र दास हे प्रत्यक्षात इतिहासाचे पदवीधर आहेत. मग त्यांना आरबीआयचे गव्हर्नर का केले ही कोड्यात टाकणारी बाब आहे. संघ आरबीआयला इतिहासजमा करायला निघाला आहे का ? असा सवालही त्यांनी केला.
याचबरोबर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावरही त्यांनी टीका केली. काँग्रेसला आमच्याशी आघाडी करायची आहे, पण त्यांना ‘एआयएमआयएम’ चालत नाही. याच ‘एआयएमआयएम’च्या खासदाराचे मत त्यांनी अणुकराराच्या वेळी अडचणीत का घेतले होते? चव्हाणांनी चारवेळा बोलाविले. मात्र त्यांच्याकडे आघाडी करण्याचे केंद्रीय नेतृत्वाने अधिकार दिले आहेत का, याचे उत्तर त्यांनी अद्याप दिलेले नाही. काँग्रेसला आम्ही हवे असू तर ‘एआयएमआयएम’लादेखील सोबत घ्यावेच लागेल. असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी महासचिव गुणवंत देवपारे यांनी केली.
या सभेला आ. वारीस पठाण, आ. इम्तियाज जलील, सागर डबरासे, राजू लोखंडे, रवी शेंडे, किरण पाटणकर, निशा शेंडे, वनमाला उके, कमलेश भगतकर, कुशल मेश्राम, जीवन गायकवाड, रमेश पाटील, नजमुन्नीसा बेगम, श्रद्धा चव्हाण, विजय मोटे आदी उपस्थित होते.