कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या पन्नास महिला कार्यकर्त्यांनी अवयवदानाचा संकल्प केला. राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांच्या न्याय हक्कासह सामाजिक चळवळ उभारण्याचे काम या ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी केले आहे. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या या महिलांनी सामाजिक बांधिलकीही जोपासण्याचे काम नेहमी केले आहे.
सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गतच शिवाजीपेठ येथील शिवाजी मंदिर येथे अवयवदान संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या पन्नास महिला कार्यकर्त्यांनी अवयवदानाचा संकल्प केला. यावेळी सातारा येथील कोमल न्यू लाईफ फौंडेशनच्या सदस्या भाग्यश्री कुराडे यांनी अवयवदानाचे महत्त्व विषद केले.
अवयवदानाची जनजागृती होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुनीता पाटील, कार्याध्यक्षा सरिता सासणे यांच्यासह ५० महिला कार्यकर्त्यांनी अवयवदानाचा संकल्प केला. या महिलांना प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले. यावेळी डॉक्टर स्मृतिका शिंदे यांचे ‘महिलांनी आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी’ या विषयावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमाला पूजा शिंदे, लता जगताप, सुवर्णा मिठारी, सुधा सरनाईक, छाया जाधव, माई वाडेकर, पल्लवी पाटील, रेश्मा पवार, अलका शिंदे, मंगल आंब्रे, स्मीता हराळे आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.