अभिशेषकुमार शर्मा (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. मृत शर्मा हे ठाण्यातील कोलशेत परिसरातील लोढा- आमरा येथे राहत होते. विवाहित असलेल्या अभिशेषकुमारला एक सहा वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या कार्यालयातील सहकारी महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर त्याला २८ नोव्हेंबर रोजी अटक झाली होती. हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले होते. सोमवारी ( दि. ३) ठाणे न्यायालयाने त्याची सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जामिनावर सुटका केली.
२८ नोव्हेंबर रोजी शर्माची पत्नी पोर्णिमा (वय ३०) हिला त्याचे हे प्रकरण समजले. सोमवारी सायंकाळी तो जामिनावर सुटल्यानंतर मात्र, तिने या प्रकरणी जाब विचारुन त्याला फैलावर घेतले. त्याच्या आई वडीलांसमोरच तिने चांगलाच पानउतारा करत त्याच्याशी कडाक्याचे भांडण केले. तिचा संयम सुटल्यानंतर तिने यातूनच त्याला मारहाणही केली. आधी पूर्वीच्या मैत्रिणीने केलेल्या विनयभंगाच्या गुन्हयात झालेली अटक आणि त्यानंतर पत्नीने आई वडीलांसमोरच जाब विचारत केलेले कडाक्याचे भांडण यातून व्यथित होऊन आपल्याच लोढा- आमरा या इमारतीच्या २५ व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.