पुणे : बहुजननामा ऑनलाईन-भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य पोलीस कोरेगाव भीमा हिंसाचारात जबाबदार असून मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना दिलेल्या आदेशांची, चौकशी आयोगाने माहिती मागवावी, अशी विनंती केली आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांनी चौकशी आयोगासमोर संभाजी भिडे यांचा उल्लेख करणे टाळले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगासमोर त्यांची बाजू मांडली. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हिंसाचारास सुरुवात झाली. त्याची माहिती मला मिळताच त्या क्षणी मी पुणे ग्रामीण पोलिसांशी फोन वरुन संपर्क साधला. मात्र, पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच या घटनेला मुख्यमंत्री, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना यासोबतच पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहेत. असेही ते म्हंटले.
इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना तसेच पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन या सर्वांनी चौकशी आयोगासमोर उपस्थित राहावे. याचबरोबरोबर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांनी बिनसरकारी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये उपमहापौर सिध्दार्थ धेंडे होते. त्या समिती मार्फत तयार करण्यात आलेल्या अहवालाशी सहमत नसून पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विरोधाभास असल्याचा दावाही त्यांनी केला.
विशेष म्हणजे पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हिंसाचारासाठी संभाजी भिडेच जबाबदार आहेत असे सांगितले परंतु चौकशी आयोगासमोर संभाजी भिडे यांचा उल्लेख करणे टाळले.