जळगाव : बहुजननामा ऑनलईन – चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आणि न्यायालयिन कोठडीत असलेल्या दोन आरोपींनी कारागृहातून पलायन केले. ही घटना आज (बुधवार) पहाटे साडे पाचच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात आणि जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
जामनेर तालुक्यातील बिलवडी येथील शेषराव सुभाष सोनवणे (28) आणि बोदवड येथील रविंद्र भिमा मोरे हे दोन कैदी कारागृहातून पळाले आहेत.
सोनवणे आणि मोरे या दोघांना चोरीच्या आरोपाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत कैदी म्हणून ४ सप्टेंबर २०१८ रोजी जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले होते. स्वयंपाक घराच्या कामाची जबाबदारी या दोघांवर होती. मात्र सकाळी साडे पाच वाजता बराकीतून या दोघांना बाहेर काढण्यात आले. थोडा वेळ काम केल्यानंतर स्वयंपाक घराच्या भिंतीवरुन उडी मारून या दोन कैद्यांनी संधी साधून पळ काढला.