मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गोवर आणि रुबेलाच्या समूळ उच्चाटनासाठी राज्य शासनाने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत राज्यातील ५७ लाख विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत लस देण्यात आली आहे. आज मंगळवारी ही मोहीम सुरु होऊन एक आठवडा पूर्ण होत आहे. दरम्यान ही लस दिल्यामुळे राज्यातील काही भागात तसेच इतर राज्यामध्ये देखील काही मुलांना त्रास झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यामुळे पालक या लसीकरणाच्या मोहिमेबाबत संभ्रमावस्थेत आहेत .
रोगप्रतिकारक शक्तीनुसार मुलांमध्ये आढळतात लक्षणे
मुंबईमध्ये ही लस दिल्यानंतर उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे या कारणांसाठी पाच मुलांना जेजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातील तीन जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. ही मुले गंभीररित्या आजारी नव्हती तर लस दिल्यानंतर रोगप्रतिकारशक्तीनुसार काही मुलांमध्ये अशी लक्षणे आढळतात, तशीच लक्षणे या मुलांमध्ये आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्यसंचालक डॉ. संजीवकुमार कांबळे यांनी दिली.
ही लस सुरक्षित : आरोग्यमंत्री
आरोग्यमंत्र्यांनी ही लस सुरक्षित असून त्यामुळे राज्यात कोणालाही अपाय झाल्याची घटना घडलेली नाही, असे स्पष्ट केले. शाळांमध्ये ही लसीकरण मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अंगणवाड्यामधील मुलांना लसीकरण करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात शाळाबाह्य मुलांना ही लस देण्यात येणार असल्याचे आरोग्यविभागाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांना ही लस देण्याबद्दल सरकारने सांगितलेले नाही. ही लस पूर्वी दिली असेल तर पुन्हा ती द्यायला हरकत नाही, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, असे डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
पालकांपुढे प्रश्न
शाळेच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर अनेक पालकांनी हे प्रश्न उपस्थित केले.
तर काहींना शाळेमध्ये भेटी देऊन लस देणे बंधनकारक आहे का याची विचारणा केली.
अजूनही काही शाळांमध्ये लसीकरणाच्या संदर्भातील माहिती देण्याचे कार्यक्रम झालेले नाहीत तसेच संमती फॉर्मही मिळाले नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
खासगी डॉक्टरांनी लस न घेण्याबद्दल प्रमाणपत्र दिले असेल तर ते आणावे, असेही काही शाळांनी पालकांना निर्देश दिले आहेत.
मात्र खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर अशा प्रकारचे संमतीपत्रक द्यायला तयार नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.