पुणे – कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेला हिंसाचार हा पुर्वनियोजित कट असल्याचा अहवाल सत्यशोधन समितीने सादर केला आहे. काही माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गटाचा हा पूर्वनियोजित कट होता. यामध्ये आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा काहीही संबंध नाही, असे देखील सत्यशोधन समितीने पत्रकार परिषदेत अहवाल सादर करताना म्हटले आहे. तसेच या हिंसाचारामागील सूत्रधार नेमके कोण आहेत यासाठी 31 डिसेंबरला शनिवरवाड्यावरील एल्गार परिषद आयोजक असलेल्या कबीर कला मंच,रिपब्लिकन पँथर या संशयित गटाची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एटीएसने जानेवारी महिन्यात अटक केलेल्या संशयित माअोवादी कोरेगाव भीमा या ठिकाणी गेले असल्याचे व एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे व हर्षाली पोतदार याच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एल्गार परिषद व कोरेगाव भिमा हिंसाचाराचे लागेबंध आहेत का त्याची चाैकशी करावी, अशाप्रकारचा मुद्दा समितीने उपस्थित केला. वादग्रस्त व खोटा इतिहास सांगणारा फलक लावण्यात आल्यानंतर देखील पोलिसांनी कारवाईकरणे गरजेचे होते., मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी व पोलीस यांची चाैकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी असे ही सत्यशोधन अहवालात म्हणले आहे.