अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन-युतीची घोषणा केल्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ एकत्र लढणार आहेत. लोकसभेपूर्वी या दोन पक्षांची येथे रंगित तालिमच होणार आहे. दोन्ही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याच्या निणर्यामुळे विरोधक धास्तावले आहेत.
औरंगाबादमध्ये एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि भारिप-बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा आयोजित केला होता. आगामी निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची युती असेल असे जाहीर करण्यात आले होते. या घोषणेनंतर महिनाभरातच अहमदनगर मनपा निवडणुक दोन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याने विरोधकांना या दोन्ही पक्षांच्या युतीच्या आवाहनाला आवर कसा घालायचा असा प्रश्न पडला आहे.
पत्रकार परिषदेत भारिपचे अशोक सोनावणे म्हणाले की, आत्तापर्यंत अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप पक्षांना आलटून-पालटून यश आले आहे. मात्र, प्रत्येक वेळी शहर विकासाच्या कामातून या पक्षांनी घोटाळे केले आहेत. अहमदनगर शहर विकासाचा पत्ता नसून शहरवासीयांना बदल हवा आहे आणि त्या बदलासाठी भारिप बहुजन-एमआयएम एक सर्वोत्तम पर्याय आहे. आमच्या युतीत सामील झालेल्या इतर पक्षाचे इच्छुक उमेदवार पाहता आम्ही महानगरपालिकेच्या सर्व १७ प्रभागातून ६८ उमेदवार उभे करणार आहोत, असे सोनावणे म्हणाले.
अहमदनगर शहरात मुस्लिमांचे प्रमाण जास्त आहे त्या मुस्लिम मतदानाचा आपल्याला फायदा होईल असा काँग्रेस आघाडीला विश्वास होता परंतु येत्या काळात मुस्लिम मत एमआयएमच्या पारड्यात जातील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्यामुळे आघाडीच्या सत्तेची गणिते चुकणार असा अंदाज शहरात वर्तवला जात आहे तसेच भारिप दलित मतांच्या बेगमी बरोबर ओबीसींना मतांसाठी साध घालणार आहे त्यामुळे नगरच्या महानगरपालिकेत कोणाचा विजय होणार हे निश्चित सांगता येत नाही. या युतीला कित्पद यश मिळते या पेक्षा कोणाचे कोणते उमेदवार पडतात यावर नगर शहरात चर्चा रंगली असून विरोधक या युतीने धास्तावले आहेत.