औरंगाबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि भारिपचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत अनुसुचित जाती-मुस्लीम ऐक्याच्या प्रयोगाचे रणशिंग औरंगाबादच्या जाहीर सभेत फुंकले आहे. औरंगाबादच्या जबिंदा मैदानावर वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली. या सभेला ५ लाखांची गर्दी झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. सभेला महिलांसह तरूणांची गर्दी उसळली होती. एमआयएम आणि भारिपने औरंगाबादवरून फुंकलेल्या या रणशिंगाने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही धास्तावले आहेत.
जबिंदा मैदानाच्या सभेत नेहरू-गांधी घराणे, काँग्रेस आणि शरद पवारांना लक्ष्य करण्यात आले. ओवेसी यांनी सभेदरम्यान बोलताना, गांधींपेक्षा आंबेडकरांचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख केला. तसेच पवारांसह राष्ट्रवादीचे अन्य नेते अजित पवार, सुनिल तटकरे यांना लक्ष्य केले.
औरंगाबादच्या सभेत बोलताना ओवेसी यांच्या गांधींपेक्षा आंबेडकरांचे देशासाठी मोठे योगदान या वक्तव्यातून एकप्रकारे अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण काँग्रेसने केल्याच्या दाव्याला शह देण्याचा त्यांनी प्रयत्न करण्यात आला आहे. धर्मनिरपेक्ष मतांमध्ये ओवेसी-आंबेडकर युतीचा परिणाम होऊ शकतो. मतांमध्ये फूट पडून थेट भाजप-सेनेला फायदा होऊ शकतो, असे मत राजकी विश्लेषक व्यक्त करत आहेत.
आज औरंगाबादेत एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाची सभा
यापुर्वी एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाच्या झालेल्या सभेलाही मोठी गर्दी झाली होती. त्यातच औरंगाबादमधील सभेनेही गर्दीचा उच्चांक गाठल्याने आगामी निवडणुकांमध्ये हा जय भीम, जय मीमचा हा प्रयोग अन्य सर्वच पक्षांसाठी अडचणीचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. मागसवर्गीय आणि अल्पसंख्यांकांची मत मोठ्याप्रमाणात वंचित बहुजन आघाडीकडे वळल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजपलाही त्याचा फटका बसू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.