बहुजननामा ऑनलाईन– भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर आज (शुक्रवार) देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ खडसे यांना मनीष भंगाळे प्रकरणात नाही तर एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर गुन्हा माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं दाखल झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली मध्ये आहेत दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ खडसे, राज्यातील कोरोना, कंगना राणौत अशा विविध विषयांवर भाष्य केलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसे यांच्या आरोपांबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले, एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी कोणतीही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत. पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागलेला नाही. त्यांना एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मनीष भंगाळे प्रकरणात त्यांना क्लिन चीट आहे. त्यांच्यावर कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला. जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडेसे यांना राजीनामा द्यावा लागल्याचे सांगताना उच्च न्यायालयाने खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा झाला असून तो गुन्हा मी दाखल केला नाही. विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं कारण नाही, आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तक्रारी घरातल्या घरात मटवू असेही फडणवीस यांनी सांगितले.
सरकारची कोरोना ऐवजी कंगनाशी लढाई सुरु
कंगना राणौत बाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अख्खी सरकारी यंत्रणा कंगनाशी लढण्यासाठी उतरली आहे. आता कोरोनाशी लढणं संपलं असून कंगनाशी लढाई सुरु आहे. या प्रकरणात जी काही चौकशी करायची ती करावी. कंगनानंही तसं सांगितलं आहे. मात्र कुठंतरी गांभीर्याने कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार कमी पडलं.