नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी महाआघाडीवर दिल्लीमध्ये बैठक घेतली. मायावती यांच्या निवासस्थानी प्रस्तावित महाआघाडीवर बैठक झाली. यावरून हत्ती सायकल चालवणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.
आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून दरम्यान, उत्तर प्रदेशमधील दोन नेते समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी महाआघाडीवर दिल्लीमध्ये बैठक घेतली आहे. विशेष म्हणजे तब्बल एक तास ही बैठक झाली असून दोन्ही नेत्यांनी जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा केली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात प्रस्तावित महाआघाडी अस्तित्वात आल्यास समाजवादी पक्ष ३५, तर बसप ३६ जागांवर निवडणूक लढवू शकतो. तसेच अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोक दलाच्या वाट्याला ३ जागा, उर्वरित ४ जागा राखीव ठेवणार असल्याचे वृत्त आले आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदार संघामध्ये कोणताही उमेदवार दिला जाणार नाही. रायबरेलीमधून संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया खासदार आहेत. इतकेच नव्हे तर प्रस्तावित महाआघाडीवर शिक्कामोर्तब झाल्यास सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला हा जबर हादरा असणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशने ‘भक्कम’ साथ दिल्यानेच भाजपला सत्तेचा सोपान गाठण्यात यश आले. या संभाव्य घडामोडींमुळे मोदींनी पुर्वोत्तर राज्यांकडे मोर्चा वळविण्यास सुरुवात केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.