बहुजननामा ऑनलाइन टीम ,मुंबई, दि. 4 सप्टेंबर : सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा वादात सापडलीय. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील तपासावरून राज्य सरकारवर आरोप करणारी कंगना आता थेट मुंबई पोलिसांवर आरोप करीत आहेत. तसेच कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरसोबत केलीय. यानंतर कंगनावर चहुबाजूने टीका केली जातेय. अशातच आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या वादात उडी घेतलीय. अमृता फडणवीस यांनीही कंगणाला ट्रोल करणार्यांना उत्तर दिलंय.
याबाबत अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी कंगनाला ट्रोल करणार्यांना उत्तर दिलंय. ’एखाद्याच्या मताशी आपण सहमत नसू. पण, लोकशाहीत व्यक्त होण्याच्या अधिकाराचे आपण रक्षण केले पाहिजे. भाषणाचे स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य, प्रेस-स्वातंत्र्य कोणी दडपू शकत नाही. एखाद्याच्या मताविषयी प्रतिवाद असू शकतो. पण टीका करणार्याच्या पोस्टरला चप्पलेने मारणे, हे योग्य नाही,’ असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलंय.
एकीकडे कंगना रणौतविरोधात मुंबईसह महाराष्ट्रातून टीकेचा सूर आवळला जात असताना अमृता फडणवीस यांनी मात्र तिच्याविरोधात आंदोलन करणार्यांना अप्रत्यक्षपणे सुनावलंय. त्यामुळे या वादात आणखी भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत केलीय. कंगना रणौतच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर मराठी कलाकरांसह सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर कंगना रणौतनं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलंय.
’कंगना रणौतला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा देखील शिवसैनिकांनी दिलाय.’ त्यावर मी 9 सप्टेंबरला मुंबईमध्ये येते आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे थेट आव्हान अभिनेत्री कंगना रणौतने दिलंय.