भिगवण : बहुजननामा ऑनलाईन – परप्रांतीय मच्छीमार व अवैध वाळू उपसा रोखण्याचे संपदा विभाग व उजनी धरण प्रशासन अपयशी ठरल्याने ११ डिसेंबरला पुणे-सोलापूर महामार्ग रोखण्याचा इशारा उजनी धरण क्षेत्रालगतच्या स्थानिक मच्छीमारांनी दिला आहे. जय मल्हार क्रांती संघटना आणि महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती संघटना यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या बाबत घोषणा केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात भीमानगर या गावाजवळ, भीमा नदीवरचे हे एक मोठे धरण आहे. त्याठिकाणी क्षमतेच्या बाबतीतला या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्याआधी पहिला लागतो. या धरणात पोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक नद्यांमधून येते. एवढी मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो. या धरणाच्या जलाशयास यशवंतसागर म्हणतात. फ्लेमिंगो (रोहित) हा परदेशी पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो. मात्र परप्रांतीय मच्छीमार विविध पक्ष्यांची शिकार करतआहेत इतकेच नव्हे तर शिकारीसाठी वापरत असलेली स्फोटके आणि बॅटरी यांमुळे मोठ्या प्रमाणात छोटी मासळी मारली जात असल्याने मत्स्य उत्पादनात मोठी घट झाली आहे त्यामुळे जवळपास चाळीस हजारांची उपजीविका धोक्यात आली आहे.
विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या आदेशानुसार छोट्या माशांच्या उत्पादनावर देशात बंदी अहे. तरी उजनी धरणातील बुडीत क्षेत्रात उत्पादन चालू आहे. याच उजनी धरणातील बुडीत क्षेत्रात उत्पादन घेणाऱ्यांवर तसेच बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटना आणि महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे.
इतकेच नव्हे तर याबाबत अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर ११ डिसेंबर रोजी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर शासनाने सुरक्षेच्या कारणावरून उजनी जलाशयाच्या ताबा जलसंपदा विभागाकडे दिला असताना अनेक परप्रांतीय बंगलादेशी मासेमारीच्या आडून उजनीला धोका पोहोचवत आहेत तसेच मत्स्यबीज मरीचे प्रमाण वाढल्याने उजनीतील विविधता संपून जाण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शासनाने वेळीच यावर कारवाई केली पाहिजे असे असेही ते म्हंटले.