प्रकाश आंबेडकर दोन मतदारसंघातून लढवणार निवडणूक…

January 26, 2019

सातारा : बहुजननामा ऑनलाईन – सभेला मार्गदर्शन करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी बाजार समित्यांची रचना केली होती. बाजार समितीवरील माणसाला आमदार-खासदार होता येणार नाही, अशी अट त्यांनी घातली होती. नंतरच्या काळात ही काढून टाकण्यात आली. त्यामुळे बाजारसमित्याही राजकारण्याच्या हातात गेल्या. त्यामुळे सरकारने हमीभाव कायदा केला तरी, तो देणारी यंत्रणा अस्तीत्वात नाही. आता राज्यकर्ते आणि बाजार समिती एक असून दोघे शेतकऱ्यांना लुटत आहे. आम्हाला जर सत्ता दिली तर आम्ही त्यांचे मॉडेल पुन्हा राबवू.

प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर या दोन ठिकाणाहून लोकसभेला उभे राहणार असल्याचे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी जाहीर केले. येथील गांधी मैदानावर झालेल्या सत्तासंपादन सभेत ते बोलत होते. साताऱ्यातही उमेदवार उभा करणार असल्याचे माने यांनी सांगितले.

संविधान चिरंतन ठेवण्यासाठी या मतदारसंघात उमेदवार उभा करायचा आहे. या मतदारसंघात भीती फार आहे असे मला सांगण्यात आले आहे. उमेदवार गरीब असला तरी त्याला पाठींबा देणार का असा सवाल उपस्थित करत आंबेडकर म्हणाले, उद्याचे संविधान वाचवा. वैचारिक नवा सामाजिक आराखडा तयार करावा लागणार आहे. तो तयार करण्यासाठी आपल्याला तरुण हवे आहेत.