हिंगोली : बहुजननामा ऑनलाइन – साडेचार वर्षानंतर निवडणुका आल्या की यांना राम मंदिराची आठवण आली. या देशातील प्रश्न मंदिराने मिटणार नाहीत तर विद्या मंदिराने मिटतील, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तथागत मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे होते. यावेळी व्यासपीठावर भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, प्रकाश कांबळे, सत्कारमूर्ती शिक्षणाधिकारी वंदना वाहूळ, संयोजक उत्तम खंदारे, अनिल खर्गखराटे, सभापती धम्मदीप जोंधळे, शिवा हातागळे, साहेबराव कदम, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, देवराव खंदारे, शामराव जोगदंड, शिवाजी साखरे, मधुकर गायकवाड, डॉ.केशव जोंधळे, अशोक धबाले, यादवराव भवरे, प्रवीण कनकुटे आदी उपस्थित होते. आज देश अदानी, अंबानी चालवित आहेत असा आरोप मिटकरी यांनी यावेळी केला.
सर्व जाती,धर्माचे कल्याण करण्याची ताकद संविधानात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवराय यांचे सिध्दांत व तत्वाचे प्रतिबिंब संविधानात पहावयास मिळते. त्यामुळेच सर्व जाती धर्मीयांना हक्क व अधिकार देण्यात आलेले आहेत. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण लोकसभा निवडणुकी पर्यंतच टिकेल, अशी भीती व्यक्त केली.
या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी वंदना वाहूळ, बौध्दाचार्य त्र्यंबक कांबळे, नामदेवराव गायकवाड, रफीक शेख ,प्रकाश खंडागळे यांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले. प्रास्ताविक सम्यक खंदारे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले. आभार प्रवीण कनकुटे यांनी केले. प्रारंभी शाहीर विजय सातोरे यांच्या भीम व बुध्द गीतांचा कार्यक्रम पार पडला.