लातूर : बहुजननामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी व सुशोभिकरण करावे, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने महापौर सुरेश पवार व मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे.
गेल्या १३ मार्च २०१७ रोजी मोठ्या थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु, दोन वर्षे उलटूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाकडे बघण्यासाठी महापालिकेकडे वेळ नाही. निवडणुका आल्या की, सर्वच पक्षांना छत्रपती शिवरायांची आठवण येते. शिवाजी चौकाची दुरवस्था झालेली असताना कोणाचेही लक्ष नाही.
येणाऱ्या ५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सुशोभिकरणाचे व पुतळ्याच्या रंगरंगोटीचे काम झाले नाही तर अखिल भारतीय छावा संघटना मनपासमोर रंगीबेरंगी आंदोलन करेल, असा इशारा छावाच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हा संपर्कप्रमुख आकाश पाटील, जिल्हाध्यक्ष सिद्धाजी जगताप, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष सोनेराव शिंदे, तालुकाध्यक्ष दीपक नरवडे, शहराध्यक्ष बालाजी निकम, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष मनोज फेसाटे, शहर उपाध्यक्ष अमोल जाधव यांनी केली आहे.