कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये घटनेच्या चौकटीत टिकणारे १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी मोठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ते कोल्हापूर येथे बोलत होते.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले होते. राजर्षी शाहूंच्या विचार आणि धोरणानुसार राज्य शासनाची वाटचाल सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने मागासवर्गीय आयोग नेमून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली आहे. केंद्र शासनाने नुकतेच आर्थिक मागास घटकासाठी १० टक्के आरक्षण घोषित केले आहे. त्यामुळे ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या घटकाला मोठा लाभ होणार आहे.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५३ जणांना १५ कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या महामंडळामार्फत तरुणांना उद्योग व्यवसायासाठी १० लाखांपर्यंतच्या कर्जाची हमी शासनाने घेतली आहे. राज्यातील पहिले डॉ. पंजाबराव देशमुख विद्यार्थी वसतिगृह कोल्हापुरात सुरू झाले आहे.