पुणे : बहुजननामा ऑनलाईन-चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आज प्रविण तरडे यांच्या कार्यालयाची चार ते पाच जणांनी तोडफोड करुन त्यांना बेदम मारहाण केली आहे. हि घटना प्रविण तरडे यांच्या पौड रोडवरील कार्यालयात दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरत असलेला ‘मुळशी पॅटर्न’ सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘आरारा…’ या गाण्यात स्थानिक गुंड झळकल्याचं समोर आल्यापासून हे गाणं चर्चेचा विषय ठरलं आहे.
पुण्या जिल्ह्यातील मुळशी या गावाची ओळख गुन्हेगारांचं माहेर घर अशी असून लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामध्ये काही गुन्हेगारांनीदेखील भूमिका केली आहे. त्यामुळे यात चित्रित केलेल्या काही घटना प्रत्यक्षात घडलेल्या असल्यामुळे चौकशीसाठी या परिसरातील अनेक गुन्हेगारांना गुन्हे शाखा २ चे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी ताब्यात घेतले आहे.
तडाखेबंद लेखणी आणि दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रवीण तरडेंचा ‘मुळशी पॅटर्न’ हा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट या शुक्रवारी (दि.२३) प्रदर्शित होत आहे. ‘मुळशी पॅटर्न’ ही नुसती काल्पनिक कथा नाही तर तो एक वास्तव अनुभव आहे. आर्थिक विकासाच्या नावाखाली एकेकाळी सुबत्ता आणि शांती नांदत असलेल्या गावाची पूर्ण वाताहत कशी झाली याची कथा म्हणजे ‘मुळशी पॅटर्न’.
गावाचे शहर झाले कि तिथे गुन्हेगारी तोंड वर काढते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुणे महानगराच्या भोवतालच्या वर्तुळात विकसित होणारी गवे आहेत त्यातीलच एक मुळशी आहे. देशात १९९१ मध्ये आर्थिक विकासाचे वारे वाहू लागले. त्यानंतर ‘आयटी पार्क’, ‘हिल स्टेशन’, ‘एमआयडीसी’ हे सगळं देशभर वाढायला लागलं. मुळशी तालुका हा पुण्यापासून ४० किमीवर आहे. पुणे महानगराच्या हद्दी पासून तो २० किमी वरच आहे. आर्थिक विकास कशा पद्धतीने होईल, कुठले उद्योगधंदे उभे राहतील, त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना त्या वेळच्या राजकारण्यांना होती.
या आर्थिक विकासाचा परिणाम देशातील अनेक गावं आणि तालुक्यांवर झाला. दिल्लीत जसं गुडगावमध्ये झालं. गुडगावमध्ये एमआयडीसी आलं, आयटी पार्क झालं. तसाच प्रकार हा महाराष्ट्रात खासकरून मुळशीसारख्या शहरांमध्ये घडला आहे. प्रवीण तरडे यांच्या कार्यालयाची तोडफोड आणि त्यांना मारहाण का झाली याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नसली तरी त्यांनी गुन्हेगारीचे वास्तव समाजपुढे मांडून गुन्हेगारी जगता कडे कुणी जाऊ नये यासाठी दिलेला संदेश कारणीभूत असावा असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.